Showing posts with label sfut. Show all posts
Showing posts with label sfut. Show all posts

Monday, May 8, 2023

आम्ही मुंबईकर


आम्ही मुंबईकर कारण  - 

* 'अ ' ठिकाणाहून  'ब' ठिकाणाचं अंतर किती आहे हे आम्ही मिनिटं -तासात मोजतो , किलो मीटर मध्ये नाही 

* ५-१७, ८-४२, ७-२४ ह्या वेळा कशाच्या आहेत हे कळायला आम्हाला अजून काही स्पष्टीकरणाची गरज नाही 

* वडा - पाव ही आमची अत्यंत आवडती डीश आहे आणि तो नाश्ता , दुपारचं जेवण किंवा 'असच काहीतरी ' ह्या सर्व कारणांसाठी खाऊ शकतो 

* संकट काळी आम्हाला सिद्धी विनायक , हाजी अली  आणि माउंट मेरी ची एकत्र आठवण येते 

* मुंबई च्या वरचे सगळे ;नॉर्थ इंडियन ' आणि खालचे सर्व  'मद्रासी ' हे आमचं अर्वाचीन मत आहे 

* जगातली सर्वात शांत, आत्म परीक्षण करायची  जागा म्हणजे मरीन ड्राईव्ह चा गजबजलेला कट्टा 

* मुंबई च्या स्वतःच्या अशा खास भाषेत - ज्यात बॉस , घंटा , निकल ले , जुगाड, मांडवली  असे विविध अद्वितीय शब्द आहेत - आम्ही पारंगत आहोत 

* आयुष्यातील नकार पचवायची दैवी शक्ती  आणि मनोबल वृद्धिंगत करण्यात इथल्या रिक्षा वाल्यांचा मोठा हातभार आहे 

* जगात कुठेही असो , 'गणपती बाप्पा ' ची आरोळी कानावर पडली की लगेच  'मोरया ' असा जयघोष मनात उठतोच 

* एकदा तरी 'ताज ' मध्ये जेवायला नाही तर किमान चहा प्यायला  तरी जायचं हे आमचं बालपणाचं स्वप्न असतंच 



Monday, April 26, 2021

वाढदिवस आणि बाबा

काल रात्री १२ वाजता लेकाने गळ्यात पडून Happy Birthday विश केलं आणि खर्र्कन जाणवलं की ह्या वर्षी मला विश करायला बाबा नाहीत . 

माझा वाढदिवस म्हणजे अगदी खास त्यांच्या साठी . एकही वर्ष असं गेलं नाही कि मला बाबांनी विश  करून काही भेट दिली नसेल 

मी शाळेत असताना वाढदिवस जसजसा जवळ येई तसे बाबा गिरगावातल्या खास खास कपड्यांच्या दुकानाच्या फेऱ्या मारायचे . आणि शॉर्टलिस्ट करायचे की ह्या वर्षी मला काय घेणार ते 

अगदी लहानपणी च नाही आठवत पण कळत्या वयातले त्यांनी घेतलेले सगळे ड्रेस मला अजूनही आठवतात . त्यांची पसंद मला आवडली नाही असही  कधी झालं नाही . 

एका वर्षी 'गोट्या ' नावाची मालिका खुप प्रसिद्ध झाली होती आणि आम्ही सर्व पाहायचो TV वर . त्या वर्षी त्यांनी मला गोट्या कादंबरी चा पूर्ण सेटच आणला होता . 

एकदा मला प्रार्थना समाज च्या एका बूकडेपो मध्ये घेऊन गेले आणि म्हणाले तुला हवी ती पुस्तक घे , मी गोंधळून १-२ छोटी छोटी पुस्तकं घेतली , मग त्यांनीच अजून ४-५ सिलेक्ट केली आणि आम्ही रमत गमत (मी उड्या मारत ) घरी आलो . 

माझं लग्न झाल्यावर देखील हा सिलसिला चालूच राहिला . एप्रिल च्या सुरवाती पासूनच ते आई ला विचारायला लागायचे काही आणलास का नाही अजून तिच्या साठी ?

जेव्हा ते स्वतः बाहेर जायचे तेव्हा काही नाही तेर ग्रांट रोड च्या मेरवान चे मावा केक तर आवर्जून आणायचे . २४ ला सकाळी सकाळी फोन यायचा शुभेच्छा द्यायला . 

गेल्या एक-दीड वर्षात त्यांचा तारखा बाबत जरा गोंधळ व्हायचा . कुठला महिना चालू आहे हे पटकन उमगत नसे. मी गेल्या ७ फेब ला त्यांना भेटायला गेले होते, तेव्हा निघताना त्यांनी विचारलं कि २४ तारखेला येशील ना तू?  मला पटकन समजलं नाही असं का विचारतायत , मी म्हटलं काय आहे बाबा ह्या २४ ला ? तर त्यांच्या खास शैलीत म्हणाले "अरे येडा , तुझा वाढदिवस नाही का ? " इतकी महत्वाची होती २४ तारीख त्यांच्या साठी . 

आता बाबांना जाऊन २ महिने झाले , ह्याच नाही तर ह्या पुढच्या प्रत्येक वाढदिवसाला मला तुमची उणीव भासणार आहे बाबा . तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम पाठीशी राहूद्या . 


Thursday, March 1, 2018

संगम

कधी पाहिला नाहीये मी नदी आणि सागराचा संगम, पण जेव्हा पाहीन तेव्हा काही मनातले प्रश्न विचारीन नदीला ,

- कसं जमतं ग तुला असं झोकून देणं ?
- भेटतेस  तू समुद्राला आणि संपतं  तुझं स्वतंत्र अस्तित्व . त्या क्षणापर्यंत तुला स्वतःच नाव असतं , तुझ्या पाण्याला तुझी अशी एक चव असते . कसं जमवतेस तू असं 'मी ' पण संपवायला ?
- वाटते का ग कधी भिती तुला सागराची , त्याच्या रौद्रावताराची?  खवळलेला असतो जेव्हा तो, त्या वेळी काय करतेस तू? आवरतेस स्वतःला की तूही जोमाने सामावतेस त्यात?
- माहित असतं ना तुला कि तुला त्याच्या खाऱ्या पाण्यात मिसळून जायचंय ? की तुला असते आशा , कदाचित तुझ्या गोडव्याने कमी होईल खारटपणा ?
- गावा गावातून , दरी खोऱ्यातून  वाहतेस तू. वेगवेगळी रूपं तुझी , कधी अथांग प्रवाह तर कधी अवखळ धारा . काय रूप असतं तुझं त्या संगम क्षणी ? आतुरलेली नवयौवना की संसार त्यागलेली शांत समाधानी साध्वी ?
- येतात का कधी अश्रू तुझ्या डोळ्यांत , आठवून आपलं उगमस्थान - मागे राहिलेलं आणि आता कायमचं दुरावलेलं ?
- माहित असतं तुला की तुझ्यासारख्याच अनेक जणी सामावणार आहेत त्या सागरात , आणि तुझा एकटीचा नाहीये तो ?
- मन भांबावत नाही तुझं की कुठे नेईल हा संगम तुला ? की असते खात्री तुला त्याच्या अथांग आवाक्याची ?
- कधी विचारतेस का तू मजेत , वर्षानुवर्ष मी माझा गोडवा ओततेय तुझ्यात , हो की तुही गोड एकदा तरी माझ्यासारखा ?
- उठतं का मनी काहूर तुझ्या कधी , 'नको येऊस ' म्हणाला कधी तर काय करायचं ? की भरवसा असतो तुला मनापासून तो असं कधीच म्हणणार नाही याचा ?
- ठाऊक असतं तुला की एकदा का त्याच्या ओढीने प्रवासाला निघालीस की मार्ग नाही परतीचा ?
- कसं जमतं तुला सतत वाहत राहणं , हे माहित असूनही की अखेर त्याच्या खाऱ्या पसाऱ्यात लुप्त व्हायचंय पण तरीही त्या संगम क्षणापर्यंत स्वतः गोडंच राहायचं ?